माणूस दु:खाच्या क्षणात भूक-तहान सर्व विसरून जातो. हे खरं असलं तरी, त्याला जगायचं म्हटल्यावर पोटात अन्न घातल्याशिवाय पर्याय नसतो. हीच परिस्थिती एखादा जवळचा दवाखान्यात ॲडमिट असल्यावर त्याच्या सोबत असणाऱ्याची होते. कारण, त्याला रूग्णाला सोडताही येत नाही. तसेच, बाहेर कुठं व्यवस्थित जेवण मिळेल, याचीही माहिती नसते. या गोष्टीवर तोडगा म्हणून व्यंकटेश फाऊंडेशनने व्यंकटेश अन्नछत्रालयाचा आरंभ केला. फक्त एक फोन आणि अ. नगरमधील कोणत्याही दवाखान्यात ॲडमिट असलेल्या रुग्णासह सोबतच्या एका नातेवाईकाला डब्बा मिळायला लागला आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे अनेकांना डब्बा शोधण्यासाठी आता वणवण फिरण्याची गरज उरली नाही. तसेच, घरचा डब्बा असल्याने शुद्ध आणि पौष्टीक जेवण रूग्णालाही मिळत आहे.
अ. नगरमध्ये अन्नछत्रालयाच्या आरंभाने आदर्श पायंडा घातला गेला आहे. कारण, दवाखाना म्हटल्यावर प्रत्येक जण धावपळीनं गळून जातो. त्यात रूग्णाकडं लक्ष देणं, त्याच्या सर्व गोष्टी पाहणं, हेही आलंच. बऱ्याच वेळा खिशात पैसेही नसतात. तेव्हा जेवायचं कसं हा प्रश्न उभा राहायचा. त्यावर मात करण्यासाठी व्यंकटेशचे अन्नछत्रालय अनेक गरजवंतांच्या कामी येत आहे. आणखी अधिक गरजवंतांपर्यंत पोहचण्यासाठी आपणही या उपक्रमात सामील व्हा. समाजासाठी चांगलं करायची संधी सोडू नका.